Wednesday, June 27, 2012

मागासवर्गीयांना उच्च शिक्षणाची दारे बंद करणारी मानसिकता

डॉ. संजय दाभाडे

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या खासगी विनाअनुदानित कॉलेजमधील दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी आणि आर्थिक मागास विद्यार्थ्यांच्या फीची तरतूद करण्याच्या सामाजिक न्यायाच्या योजनेत राज्य सरकारने अचानक बदल केला. यामुळे मागासवर्गीयांना उच्च शिक्षणाची दारे बंद होणार होती. यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या मागासवर्गीयांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंबेडकरी चळवळीने दाखविलेली ही जागरुकता आणि एकजूट यांमुळे सरकारला आपला आठवडाभरापूर्वीचाच निर्णय रद्द करावा लागला. मात्र, सरकारने आधी घेतलेल्या या निर्णयामागची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे.

दोन लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे संपूर्ण फी भरावी लागणार होती. यापूर्वी पालकांच्या उत्पन्नाचा विचार न करता अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी राज्य सरकार भरत होते. म्हणजे एखाद्या खासगी मेडिकल कॉलेजची फी पाच लाख रु. असेल, तर ती सरकार स्वत: भरत होते. व्हीजेएनटी/ ओबीसी/ एसबीसी/ ईबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही दोन लाख रुपये उत्पन्नाची अट लागू झाली. पूर्वी या विद्यार्थ्यांची निम्मी फी सरकार भरत होते. नवीन बदलानुसार एमबीबीएससाठी दोन लाख, डेंटलसाठी १.२० लाख, आयुर्वेदसाठी ७० हजार, इंजिनीअरिंग डिप्लोमासाठी २५ हजार, तर पदवीसाठी ५० हजार रु. एवढीच फी सरकार भरणार होते. फीची उर्वरित रक्कम विद्यार्थ्यांना स्वत: भरावयाची होती. फीची ही सवलत कुटुंबातील फक्त दोनच अपत्यांना देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्यातही एक मुलगा व एक मुलगी असेल, तर दोघांना; दोन्ही मुली असतील, तर दोघींना; पण दोन मुलगे असतील तर फक्त एकाच मुलाला ही सवलत दिली जाणार होती.

सवलतीतील या बदलांमुळे, मागासवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या ७० ते ८० टक्के पात्र विद्यार्थ्यांना केवळ पैसे नाहीत या कारणाने विनाअनुदानित खासगी कॉलेजमधील प्रवेशापासून वंचित व्हावे लागले असते. एकीकडे सुमारे तीन दशकांपासून सरकारने स्वत:चे कॉलेज सुरू करणे थांबवले असून, उच्च शिक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढला आहे. त्याऐवजी शिक्षणाचा धंदा करून विद्यार्थी पालकांची पिळवणूक करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षण संस्था, अभिमत विद्यापीठांना मान्यता देऊन शिक्षण माफियांना मोकाट रान करून दिले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सुमारे ९० टक्के संस्था विनाअनुदानित व खासगी आहेत. साहजिकच याच संस्थांचे दरवाजे प्रवेशासाठी ठोठावणे अटळ झाले आहे. विशेषत: २००३नंतर विनाअनुदानित संस्थांना मोकाट रान देणाऱ्या काही निकालांमुळे आणि बहुसंख्य संस्था प्रस्थापित भांडवली पक्षांच्या पुढारी व मंत्र्यांच्याच मालकीच्या असल्यामुळे त्यांच्यावर कठोर नियंत्रण ठेवण्यात कुचराई झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या धोरणांमुळे प्रवेशप्रक्रियेत प्रचंड घोटाळे व भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येऊ लागली.
 
याच दरम्यान मागासवर्गीयांना या संस्थांमध्ये प्रवेशाचा रस्ता खुला करणारी ९३वी घटनादुरुस्ती संसदेने केली. शिक्षणाच्या बाजाराच्या विरोधात जनतेत खदखदणारा असंतोष शिक्षण माफियांच्या मुळावर उठण्याची वेळ येऊ नये म्हणून कोणतीही उत्पन्नाची अट न लावता अनुसूचित जाती, जमातीची व उत्पन्न मर्यादा घालून विशेष मागासवर्गाची संपूर्ण फी व भटके-इतर मागास व आर्थिक मागासांची ५० टक्के फी भरण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने वाजतगाजत घेतला.

गेली सहा वर्षे शुल्क प्रतीपूर्तीची ही योजना व्यवस्थित सुरू होती. सर्वसमावेशक वाढीचा डंका पिटणाऱ्या सरकारने अशी सवलत देणे ही काही फार विशेष गोष्ट नाही. किंबहुना अशा किरकोळ सवलती देऊन व त्या मिरवून मागास व शोषितांचा आवाज बंद करून व्यापक जबाबदारीतून पळ काढणे सत्ताधाऱ्यांना सोपे जाते. मुळात सरकारच्या सोयीसाठी व कल्याणकारी राज्य व्यवस्थेचा फक्त देखावा करून शोषितांना खोटे समाधान देऊन प्रत्यक्षात त्यांची बोळवण करणारी ही योजना चालू ठेवणेही राज्यकर्त्यांना नकोसे झाले आहे. शुल्क प्रतीपूर्तीच्या योजनेमुळे पाच वर्षांत १, ५०० कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडतो, असे राज्य सरकारचे म्हणणे असून, दलित व आदिवासी मंत्र्यांनीदेखील सरकारचे हे म्हणणे मान्य करणे धक्कादायक आहे. एससी आणि एसटी यांना घटनात्मक संरक्षण असणारे बजेट पूर्णपणे खर्च केले जात नसताना व हा निधी अन्यत्र वळवला जात असतानाच निधीच्या कमतरतेचे कारण देणे दिशाभूल करणारे आहे. एससी व एसटी या घटकांच्या हक्काच्या निधीवर राज्यकर्त्यांनी आजपर्यंत किती व कसा डल्ला मारला आहे, याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाल्यास ही शुल्क प्रतीपूर्तीची योजना किती क्षुल्लक आहे, हे ध्यानात येईल. भटके-विमुक्त व ओबीसींनादेखील त्यांचा वाटा मिळाल्यास सरकार करीत असलेली धूळफेक स्पष्टपणे समोर येईल. वास्तविक या घटकांच्या शिक्षणासाठी या निधीचा प्राधान्याने उपयोग व्हायला हवा. दुष्काळाचे कारण दाखवून या बजेटचे लचके तोडू नयेत. खरे तर शिक्षण माफियांशी साटेलोटे असणाऱ्या सरकारला दलित, आदिवासी, भटके, मागास व गरिबांना खासगी संस्थांमधून बाहेरचा रस्ता दाखवून रिक्त राहणाऱ्या जागांचा लिलाव व धंदा करण्यासाठी संस्थाचालकांना मोकाट सोडायचे आहे.

या विरोधात निवेदन देण्यासाठी आरक्षण हक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तेव्हा ' मागासवर्गीयांनी कर्ज काढून शिकावे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांनादेखील कर्जबाजारी करून आत्महत्या करायला भाग पाडण्याचे राज्यकर्त्यांनी ठरविले असावे. २००४ मध्ये शैक्षणिक कर्ज नाकारण्यात आलेल्या रजनी आनंद या केरळातील दलित विद्यार्थिनीला तेथे काँग्रेसची सत्ता असताना आत्महत्या करावी लागली. केंद्रीय नियोजन आयोगाने अलीकडेच जाहीर केल्यानुसार व बिर्ला-अंबानी अहवालाच्या शिफारशीनुसार संपूर्ण उच्च शिक्षणाची उभारणी विद्यार्थ्यांना कर्जबाजारी बनवून करण्याचे घोषित झाले आहे. विद्यापीठांना अनुदान देणे बंद करण्याची भूमिका नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी नुकतीच मांडली आहे. उद्योगपतींच्या संघटना याच आशयाच्या सूचना करीत असून, सर्व सत्ताधारी वर्ग एका सुरात गात आहे. उरल्यासुरल्या सरकारी संस्थांचीदेखील जबाबदारी झटकून त्यांचे शैक्षणिक कर्ज योजनेतून खासगीकरण करण्याची बडे भांडवलदार व जागतिक बँक यांची योजना आक्रमकपणे समोर येत आहे. मागासवर्गीय आज जात्यात असले, तरी एकूण सर्व समाजच सुपात आहे. ही बाब वेळीच लक्षात घेऊन उच्च शिक्षणाची उभारणी उगवत्या पिढीला कर्जबाजारी विरोधात एकजुटीने संघर्ष करायला हवा.

Tuesday, June 12, 2012

पुनःश्च बीड

किरण मोघे

साधारणतः एक वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे एका नाल्यात ९ स्त्री अर्भके सापडल्यानंतर महाराष्ट्रात बरीच खळबळ माजली होती. त्याच सुमारेस पुण्याच्या सदाशिव पेठेत बेकायदेशीर लिंग-निदान करताना दोन प्रतिष्ठित डॉक्टरांना जनवादी महिला संघटनेने रंगे हात पकडले. इतर काही ठिकाणी धाडी टाकून महाराष्ट्रात लिंग-निदान राजरोसपणे सुरु असल्याचे महिला संघटनांनी उघड करून दाखवले. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परिणामी आरोग्य मंत्र्यांना काही घोषणा कराव्या लागल्या. आळसावलेली सरकारी यंत्रणा थोड्या फार प्रमाणात कामाला लागली. लिंग निदान कायद्यांतर्गत गठित केलेल्या परंतु अगोदरच्या सभासदांचा कालावधी संपल्यामुळे निष्क्रीय झालेल्या राज्य निरीक्षण मंडळाची परत स्थापना करण्यात आली. राज्यातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली गेली. सरकारने जी हेल्पलाईन सुरु केली त्यावर काही तक्रारी नोंदवल्या गेल्या. महाराष्ट्र मेडिकल कौंसिल, इंडियन मेडिकल असोसिएशन इत्यादिने असले गैरप्रकार पाठीशी घालणार नाही असे जाहीर केले. विविध संस्था-संघटनांनी चर्चासत्रे आयोजित केली. गणेश मंडळांनी आपल्या देखाव्यांमधून प्रश्न मांडला. लेकी वाचवण्याचा जागर करण्यासाठी काही आमदार-खासदारांनी यात्रा काढल्या. ह्या निमित्ताने महाराष्ट्रात मुलींची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचा प्रश्न ऐरणीवर आल्या सारखे वाटले. पण नंतर नेहमीप्रमाणे सर्व काही शांत झाले, बेकायदेशीर कृत्य करणारी डॉक्टर मंडळी आपापल्या कामाला लागली, आणि आज परत एकदा परळी, बीड सहित महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून स्त्री अर्भके, मृत मुली सापडल्याच्या मन सुन्न/विषण्ण करणाऱ्या घटना पुढे येत आहेत.

आता मात्र आमदार-खासदारांची आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक संघटनांची बोलती बंद झालेली दिसते! परळीच्या कुप्रसिद्ध डॉक्टर मुंढे दांपत्याच्या मागे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे इतके जबरदस्त पाठबळ आहे की तिथली पोलीस आणि न्याययंत्रणा कुचकामी ठरलेली दिसते. जन-क्षोभ उसळला नसता, आणि महिला संघटना व प्रसार-माध्यमांनी प्रकरण लावून धरले नसते तर मुंढे, सानप व त्यांच्या भाऊबंधांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये थाटलेला बाजार आणखीन जोरात चालू राहिला असता. आणखीन १० वर्षांनी जनगणनेच्या आकडेवारीत मुलींचे प्रमाण दर हजार मुलांमागे ५०० पेक्षा कमी असल्याची अधिकृत घोषणा झाली असती, परंतु तोपर्यंत परिस्थिती आटोक्यात आणण्याची वेळ टळून गेली असती इंग्रजीत म्हणतात तसे बाय देन इट वुड बी टू लेट!

खरे तर महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण सातत्याने घटत असल्याचा सावधानतेचा इशारा दहा वर्षांपूर्वी २००१ च्या जणगणनेतून व्यक्त झाला होता. २००१ मध्ये तुलनेने सधन पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात मुलींचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले होते, पण २०११ पर्यंत हे लोण आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्यात (बीड-८०१, जालना-८४७, औरंगाबाद-८४८, परभणी-८६६, लातूर-८७२) किंवा कृषिसंकट-ग्रस्त विदर्भात (बुलढाणा-८४२, वाशिम-८५९) पसरलेले दिसते. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे लिंग-निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये महाराष्ट्र सरकार पूर्णतः निष्क्रीय राहिले. परिणामी राज्यभरात लिंग-निदानाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यातून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या  डॉक्टरांचे जाळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पसरत गेले. २०११ च्या जनगणनेने बीड, त्याच बरोबर जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, कोल्हापुर, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याबद्दल धोक्याची घंटा जोरात वाजवली होती. तरी देखील महाराष्ट्र सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने लिंग-निदानाची प्रथा बंद पाडण्यासाठी कोणतीच कठोर पावले उचलली गेलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

आज हे परत परत अधोरेखित करण्याची आवश्यकता आहे की डॉक्टरांनी सांगितल्या शिवाय लिंग-निदान व त्यानंतरचा गर्भपात होऊच शकत नाही, आणि त्यामुळे महाराष्ट्रात आणीबाणीची परिस्थिती निर्माण करण्यात त्यांचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासन व राज्यकर्त्या वर्गाचा मोठा वाटा आहे. हे ही तितकेच खरे आहे की मुलगी म्हणजे ओझं आहे ही भावना समाजात बळावत चालला आहे. परंतु शुद्ध बाजारवादी दृष्टीकोनातून पैशाच्या लोभापायी लिंग-निदान करणारे डॉक्टर व वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक कारणास्तव (वंशाला दिवा, म्हातारपणाची काठी, अंत्यसंस्कार, शिक्षणाचा वाढता खर्च, हुंड्याला आलेले बीभत्स बाजारू स्वरूप, स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांमुळे असुरक्षित वातावरण, किंवा शुद्ध गरिबी) लिंग-निदान करून घेणारे आईवडील, आणि विशेषतः त्यातील स्त्री ह्यांना समान लेखणे चुकीचे ठरेल. भारतीय समाजात पुत्रहीन स्त्रीला कशी वागणूक मिळते ह्याचा पिढ्यानपिढ्या अनुभव स्त्रियांनी घेतला असल्याने अनेक स्त्रिया नाईलाजाने लिंग-निदान करायला तयार होतात. परंतु डॉक्टरांनी तसे करण्यास नकार दिला तर ते ताबडतोब थांबेल, हे स्पष्ट आहे. एकीकडे समाज प्रबोधन आणि स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याची लढाई तर दुसरीकडे कायद्याचा बडगा अशी व्यूहरचना आखून प्रश्न सोडवायला हवा.  

म्हणूनच स्त्री संघटना आणि आरोग्य हक्क संघटना ह्यांनी प्रयास करून १९९४ मध्ये लिंग-निदान प्रतिबंधक कायदा मंजूर करून घेतला. परंतु केवळ कायदा करून भागत नाहीं, हितसंबंधी व्यक्ती त्याची अंमलबजावणी होऊ देत नसल्याने तो आपणच चालवावा लागतो हा कटू अनुभव घेतल्यानंतर २००३ मध्ये परत एकदा ह्या संघटनांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागावी लागली. कायदा दुरुस्त झाला, पण शासनाने तो मनावर घेतला नाही, आणि मुलींची संख्या घटत राहिली.

ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातली सध्य परिस्थिती. मुंढे दाम्पत्यावर अगोदर तीन खटले चालू असताना त्यांची जामिनावर सुटका होऊन त्यांचा धंदा बिनदिक्कतपणे  चालू होता. सानप मंडळींचे परवाने रद्द केले असताना देखील ते बेकायदेशीर गर्भपात करीत होते. सध्या हिरहिरीने तपास करून मशीन सील करणाऱ्या यंत्रणेला आजपर्यंत हे लक्षात कसे आले नाही? ४३ डॉक्टर दोषी आढळून आल्यानंतर त्यांची यादी राज्य सरकारने पूर्वीच महाराष्ट्र मेडिकल कौंसिलकडे पाठवली परंतु प्रत्यक्षात परवाने रद्द करण्यासाठी प्रचंड विलंब होत आहे, आणि दरम्यान अनेक निष्पाप मुलीचे बळी जात आहेत. दोषी डॉक्टर स्वतः लिंग-निदान प्रतिबंधक कायदा अथवा एमटीपी कायद्याच्या देखरेख समित्यांचे सभासद असतात! पोलीस जामीनपात्र कलमे लावतात, किंवा कोर्टात जामिनाला विरोध करण्यासाठी सरकारी वकील गैरहजर राहतो आणि अधिकाऱ्यांना माहिती नसते, डॉक्टर फरार होतात आणि सापडत नाहीत, हे राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासन डॉक्टरांचे साटं-लोटं ह्यांच्या शिवाय होऊच शकत नाही. म्हणूंच सर्व खटले बीड-औरंगाबाद बाहेर चालवा अशी मागणी करण्याची वेळ येते.

हे सर्व झाकण्यासाठी आज स्त्रियांवर आणि त्यांच्या गर्भपाताच्या हक्कावर लक्ष केंद्रित केले जात आहे. बीड मध्ये बेकायदेशीर गर्भपात करून घेणाऱ्या स्त्रियांना शोधून काढण्यासाठी ५ लाख रुपयांचे बक्षिश जाहीर केले जाते, पण मुंढे दाम्पत्यासाठी फक्त ४०००० रुपये जाहीर होतात, ह्यातून बरेच काही समजते. त्या दोन अविवाहित, गरीब,  स्थलांतर करणाऱ्या उस-तोड कामगार स्त्रियांची किती भयानक अवस्था असेल ह्याचा विचार केला जात नाही. बेकायदेशीर, परवाना नसलेल्या गर्भपात केंद्रांची अवश्य तपासणी करावी, परंतु आपले लक्ष्य लिंग-निदान प्रतिबंधक कायदा आणि तो मोडणारे डॉक्टर आहेत, मजबुरीने गर्भपात करणाऱ्या महिला नव्हेत हे भान ठेवले नाही तर पुनःश्च बीड घडेल.

Tuesday, June 5, 2012

AIDWA: Inpect all Sonography and Nursing Homes in Beed and Other Critical Districts of Maharashtra

AKHIL BHARATIYA JANWADI MAHILA SANGHATANA
(All India Democratic Women’s Association)
Maharashtra State Committee


Press Release:


The Maharashtra unit of the All India Democratic Women’s Association expresses its deep concern and distress about the series of incidents in the last few days wherein female foetuses ranging from 5-9 months have been found abandoned in Beed, Latur and some other districts of Marathwada. 

The warning signals about the steep decline in child sex ratios in Maharashtra had been sent out more than a decade ago in the 2001 Census figures. The Maharashtra government, with whom squarely rests the responsibility of implementing the PcPNDT Act, chose to remain inactive and unresponsive to the situation. This has resulted in the growth of a network of doctors in different districts who are promoting, and profiteering from, sex selection. By 2011 census, Beed and five other districts, Jalgaon, Ahmadnagar, Buldhana, Kolhapur, Aurangabad and Jalna showed critically low sex ratios. However, the state government displays neither the political will nor strong action necessary to put an end to sex selective practices. 

The recovery of 9 female fetuses from a river in Parali Vaijnath in Beed district a year ago or the various sting operations conducted by AIDWA and other women’s organizations across the state have revealed a deep rooted nexus between certain mercenary medical professionals and the state and district administration responsible for implementing the PcPNDT and MTP Acts. It is shocking that despite three cases registered against them, Dr. Sudam Mundhe and Dr. Saraswati Mundhe continued their abhorrent practices with impunity. The fact that they wielded such clout and terror is clear from the fact that the team that went to investigate their hospital had to do so with the help of police protection. It is shocking that the pair remains absconding to date, and the police department announces a paltry sum of Rs. 40,000 to report their whereabouts! It points to the immense political patronage that they have enjoyed from the ruling and the main opposition parties. Equally shocking is the complicit silence from the medical profession. 

In such a situation, it is imperative that the State and Central governments, and elected bodies from the medical profession display a sense of purpose to bring to book those doctors who are blatantly flouting laws in pursuit of profit. What is required is the strictest implementation of the PcPNDT and MTP laws and all other rules regulating medical practice. To talk merely about changing social mindsets at this critical juncture would only divert away from the importance of regulating and monitoring sonography clinics and ensuring that MTP Act is properly implemented. 

There is also a need to understand the plight of women and the circumstances that force them to undergo such dangerous abortions, rather than equating them as culprits with criminal doctors. It is imperative that the Government of Maharashtra responds by calling a meeting with representatives of women’s organizations to work out a joint strategy to deal with this situation of emergency. 

AIDWA demands:

  • Immediate arrest of absconding Mundhe couple;
  • No bail to the doctors found guilty in fresh cases of violation of PcPNDT and MTP Acts and cancellation of bail in previous cases facilities and helpline for women in distress;
  • Fast Track courts for all pending cases;
  • Widespread monitoring and inspection of all USG machines, sonography, and nursing homes, with immediate on the spot cancellation of licences if violations are found;
  • No victimization and monitoring of pregnant women and women who have recently delivered. Counselling facilities and helpline for women in distress;
  • All advisory committees at different levels set up under the PcPNDT Act must have representatives of active women’s organizations and health right activists. 

(Kiran Moghe)                                                                           (Sonya Gill)
State President                                                                         State Secretary 
9422317212                                                                              9869250126 

बीड सह महाराष्ट्रतील सर्व अति-संवेदनशील जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी यंत्र व प्रसुती गृहांची कसून तपासणी करा


अ. भा. जनवादी महिला संघटना, महाराष्ट्र राज्य समिती

बीड, लातूर, तसेच महाराष्ट्रच्या इतर काही जिल्ह्यातून ५-९ महिन्यांची मृत स्त्री अर्भके सापडल्याच्या धक्कादायक घटना गेल्या दोन-तीन दिवसात उघडकीस आल्या आहेत. त्याबद्दल अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची महाराष्ट्र राज्य समिती तीव्र चिंता आणि क्लेश व्यक्त करीत आहे.

महाराष्ट्र राज्यात मुलींचे प्रमाण सातत्याने घटत असल्याचा सावधानतेचा इशारा दहा वर्षांपूर्वी २००१ च्या जणगणनेतून व्यक्त झाला होता. असे असताना देखील लिंग-निदान प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र सरकार पूर्णतः निष्क्रीय राहिले. परिणामी राज्यभरात लिंग-निदानाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यातून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या  डॉक्टरांचे जाळे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पसरत गेले. २०११ च्या जनगणनेत बीड, त्याच बरोबर जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, कोल्हापुर, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात स्त्री-पुरुष प्रमाण प्रचंड घटलेले दिसले. तरी देखील लिंग-निदानाची प्रथा बंद पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने कोणतीच कठोर पावले उचलली गेलेली नाहीत. 

एक वर्षा पूर्वी बीड मध्येच परळी वैजनाथ येथे नदीत ९ स्त्री अर्भके मृत अवस्थेत टाकून दिलेली सापडली होती. जनवादी महिला संघटना, लेक लाडकी अभियान व इतर महिला संघटनांनी राज्याच्या विविध भागात धाडी टाकून, वैद्यकीय क्षेत्रातील काही नफेखोर मंडळी आणि लिंग-निदान प्रतिबंधक व गर्भपाताच्या कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या राज्य व जिल्हा प्रशासनातील लागे-बांधे उघडकीस आणले होते. डॉ. सुदाम व डॉ. सरस्वती मुंढे ह्यांच्यावर अगोदर कायद्यांचे उल्लंघन केल्याचे तीन गुन्हे दाखल असताना त्यांची दुष्कृत्य राजरोसपणे चालूच राहिली ही अतिशय धक्कादायक बाब आहे. त्यांचा एवढा दरारा होता की त्यांच्या हॉस्पिटलची तपासणी करणाऱ्या अधिकारी वर्गाला पोलिसांचे संरक्षण घ्यावे लागले! आज तागायत हे दांपत्य सापडलेले नाही आणि त्यांची माहिती सांगण्यासाठी पोलीस केवळ रु. ४०००० रुपयांचे फुटकळ बक्षिस जाहीर करते ह्यावरून बरेच काही समजते. प्रमुख सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांचे त्यांना किती जबरदस्त पाठबळ आहे हे ह्यावरून दिसून येते. तसेच वैद्यकीय क्षेत्राकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही ह्याबद्दल सुध्दा आम्हाला आश्चर्य वाटते.

अशा गंभीर परिस्थितीत केंद्र वा राज्य सरकारांनी, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील प्रातिनिधिक संस्थांनी (उदा. महाराष्ट्र मेडिकल कौंसिल, इत्यादि) नफ्यासाठी कायदे मोडणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध ताबडतोबीने कठोर कारवाई केलीच पाहिजे. लिंग-निदान प्रतिबंधक कायदा, गर्भपाताचा कायदा व वैद्यकीय क्षेत्राच्या कामकाजाचे नियंत्रण करणाऱ्या नियमांचे कठोर पालन करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. समाज प्रबोधनाच्या नुसत्या गप्पा मारून चालणार नाही, ताबडतोबीने आवश्यकता आहे सोनोग्राफी केंद्रांची कसून तपासणी व गर्भपाताच्या कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीची.  

तसेच ज्या स्त्रिया अशा पद्धतीने स्वतःला गंभीर धोका पत्करून धोकादायक गर्भपात करून घेतात, त्यांची नेमकी परिस्थिती समजून घेण्याची सुध्दा गरज आहे. कायदा मोडणाऱ्या डॉक्टरांच्या बरोबरीने त्यांना गुन्हेगार ठरवणे योग्य ठरणार नाही. महाराष्ट्र सरकारने राज्यातील ह्या प्रश्नावर सक्रीय असलेल्या सर्व महिला संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक आयोजित करावी आणि ह्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संयुक्त कार्यक्रम आखावा.

जनवादी महिला संघटनेच्या तातडीच्या मागण्या:
  • मुंढे दांपत्याला ताबडतोबीने अटक करा
  • ज्या डॉक्टरांनी लिंग-निदान प्रतिबंधक व गर्भपाताचा कायदा मोडला आहे, त्यांना जामीन देऊ नये. जुन्या प्रकारणात जामीन मिळाला असेल तर तो ताबडतोब रद्द करावा.
  • जलद गती न्यायालये सुरु करून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकालात काढावीत 
  • सर्व सोनोग्राफी यंत्र, सोनोग्राफी क्लिनिक आणि प्रसुती-गृहांची ताबडतोबीने कौन तपासणी करावी. कायद्याचे उल्लंघन आढळून आल्यास तिथल्या तिथे परवाने रद्द करून ती बंद करण्यात यावीत.
  • गरोदर स्त्रियांना गुन्हेगार ठरवू नये, गरोदर व नव-बाळंतीण स्त्रियांना टोक बनवू नये. ज्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे अशांसाठी मदत केंद्र-हेल्प-लाईन सुरु करावी
  • लिंग-निदान प्रतिबंधक कायद्याखाली गठित केलेल्या सर्व पातळीवरील सल्लागार समित्यांवर ह्या विषयात सक्रीय असलेल्या महिला संघटना व आरोग्य हक्क कार्यकर्त्यांची नेमणूक करावी.

(किरण मोघे)                                          (सोन्या गिल)
राज्य अध्यक्ष                                           राज्य सचिव
९४२२३१७२१२                                                               ९८६९२५०१२६